पारदर्शक प्रशासन, समान न्याय, सर्वांगीण विकास
“सशक्त, स्वावलंबी आणि समृद्ध गाव निर्माण करणे, जिथे प्रत्येक ग्रामस्थाला समान संधी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा आणि सुरक्षित वातावरण मिळेल. पारदर्शक व लोकसहभागी प्रशासनाच्या माध्यमातून गावाला आदर्श, प्रगतिशील आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनवणे.”
“ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन उभारणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे. शिक्षण, क्रिडा, आरोग्य, स्वच्छता, शेती आणि पायाभूत सुविधा यांचा विकास साधून प्रत्येक ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे तसेच गावाला आदर्श, सक्षम व स्वावलंबी बनवणे.”
जनगणना 2011 नुसार, जुनेखेड (June Khed) या गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड 568385 आहे. या गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ६५७ हेक्टर आहे आणि या ठिकाणाचा पिनकोड 416313 आहे. उरण इस्लामपूर हे या गावाजवळील सर्व प्रमुख आर्थिक उपक्रमांसाठीचे जवळचे शहर असून ते अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीने, जुनेखेड गावाचे प्रशासन हे सरपंच या निवडून आलेल्या ग्रामपंचायत प्रमुखाकडे असते. हे प्रशासन भारताच्या घटनेनुसार आणि पंचायतराज कायद्यानुसार कार्य करते. गावातील नागरी सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच विकासकामे या स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीत येतात. निवडणुकीच्या दृष्टीने हे गाव इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आणि हातकंगले लोकसभा मतदारसंघात येते.
जुनेखेड गावाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेष योगदान दिले. या गावाचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी घनिष्ठ नाते होते. या गावाला पत्री सरकार चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात असे. पत्री सरकारची पहिली जाहीर सभा हि या गावामध्ये झाली होती. गावातील स्वतंत्र सैनिकांनी व ग्रामस्थांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्वातंत्र्यलढ्यात सहकार्य केले होते. गावातील स्वातंत्र्यसैनिक रंगराव तुकाराम (केरू) पाटील, शामराव दत्तू पाटील, भगवान रामचंद्र पाटील यांच्यासह अनेक तरुणांनी सत्याग्रह, आंदोलन आणि स्वदेशी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. विदेशी माल बहिष्कार व चरख्याचा प्रसार गावात झाला. काहींनी तुरुंगवास भोगला तर काहींनी आर्थिक योगदान दिले.
जुनेखेड हे प्रसिद्ध रामकवी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यांच्या रचना व कविता यांना विशेष लोकमान्यता लाभली आहे. या कवितांचे गायन पट्टे बापूराव स्वतः करत असत, त्यामुळे या काव्यपरंपरेला अधिक प्रसार व लोकप्रियता मिळाली. गावाला लाभलेला हा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा आजही ग्रामस्थांच्या अभिमानाचा भाग आहे. शेतकरी संख्या जास्त असलेने शेतीशी सल्ग्नित सण व उत्सव (बैलपोळा, नागपंचमी, दसरा, दिवाळी) तसेच गणेशोत्सव, रंगपंचमी हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
पोलीस दलामध्ये केलेल्या विशेष कार्याबद्दल श्री. आनंदराव केशव शिंदे यांना राष्ट्रपती पदक मिळवले. श्री.राजाराम गुंडा जाधव यांना पंतप्रधान कार्यालयाद्वारे समाज सेवक म्हणून सन्मानपत्र देणेत आले.
मौजे खेड गावाला समृद्ध क्रीडा परंपरा लाभली आहे. येथेच जन्मलेल्या गणपत खेडकर पैलवान यांनी आपल्या कुस्तीच्या अद्वितीय कौशल्याने महाराष्ट्र क्रीडा इतिहासात अढळ स्थान मिळवले. ते महाराष्ट्र केसरी हा किताब दोनदा जिंकणारे पहिले डबल महाराष्ट्र केसरी ठरले. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे मौजे खेड गावाचे नाव राज्यभरात आणि देशभरात गौरवाने घेतले जाते. स्फूर्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने कब्बड्डी या खेळ प्रकारात गावाचे नाव राज्यपातळीवर नेले.
गावातील सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे.
स्वच्छ पाणी, रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे.
ग्रामस्थांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून लोकशाही मजबूत करणे.
ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि रोजगार यामध्ये सुधारणा करणे.
वृक्षलागवड, जलसंधारण आणि स्वच्छता मोहिमा राबवून पर्यावरणाचे रक्षण करणे.
शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून लोकांसमोर जबाबदारीने प्रशासन चालवणे.